Saturday, 13 January 2018

कान्हेवाडी तर्फे चाकण….स्वच्छ, सुंदर व स्मार्ट गाव


*कान्हेवाडी तर्फे चाकण….स्वच्छ, सुंदर व स्मार्ट गाव*  -- सचिन अडसुळ

कान्हेवाडी तर्फे चाकण हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये जिल्हा मुख्यालयापासून 31 तर तालुका मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. गावांमध्ये इंद्रायणी ही मुख्य नदी आहे. विशेष म्हणजे कान्हेवाडी हे गाव देहू या तिर्थक्षेत्राजवळ आणि खेड-मावळ आणि हवेली या तिन्ही तालुक्यांच्या सीमेलगत वसलेलं आहे. गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 973 असून गावाची कुटुंब संख्या 204 आहे  

गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती  आहे. यामध्ये ऊस, फुलशेती, भाजीपाला, भात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावात 1990 पासूनच विकासात्मक कामांना सुरुवात झालेली दिसते. शासनाच्या आदर्श गाव योजनेत सहभाग नोंदवून गावाने नव्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. प्रचंड लोकसहभाग, महिलांचा आणि युवकांचा सहभाग,  कणखर  नेतृत्व यातून गावाने पाणी, स्वच्छता, पर्यावरण यामध्ये प्रचंड काम केलं आहे. मग गावातील रस्ते, शाळा, अंगणवाड्या, युवकांसाठी व्यायामशाळा, स्मशानभूमी, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, या सर्वच विषयांमध्ये सरपंच अन् तत्कालीन सदस्य यांनी झपाटून काम केले आहे. 204 कुटुंबांच्या सांडपाण्यावर गावात प्रचंड मोठी वृक्षलागवड करून सांडपाण्याचा पुनर्वापर केला आहे.सर्व कुटुंबामधून बाहेर पडणारे सांडपाणी सरळ नदीत न सोडता त्याच्यावर स्थिरीकरण तळ्यातून प्रक्रिया करून फळबागेसाठी वापरले जाते. गावातील घनकचरा प्रकल्प नाविन्यपूर्ण असून न कुजणारा कचरा-प्लास्टिक वेगळे केले जाते तर कुजणारा कचरा नाडेप खड्डय़ात टाकला जातो. शुद्ध पाण्यासाठी गावात आर.ओ. फिल्टर प्लांट बसवण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजनेवरून विहिरीतील पाणी यासाठी वापरण्यात येते. पाच रुपयाला वीस लिटरची दिले जाते. सर्व गावातील सांडपाणी भूमिगत गटारीतून नदीकाठी असलेल्या स्थिरीकरण तळयात सोडले जाते. गावाची सर्व करवसुली दरवर्षी १ एप्रिलाच एका दिवशी जमा होते. गावात ठिकठिकाणी म्हणी, स्वच्छतेचे संदेश स्वच्छतेची शपथ, जलप्रतिज्ञा असे वेगवेगळे संदेश लावण्यात आले आहेत. गावातील सिमेंट रस्ते, त्या बाजूची झाडे, स्वच्छ घरे, मंदिरे गावाचे सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. कान्हेवाडीला 2006 मध्येच निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे. आजही संपुर्ण गाव हागणदारीमुक्त आहे. स्वच्छता हे गावाचं प्रतिक. प्रत्येक घरात स्वच्छते बरोबरच पाण्याचे व्यवस्थापन, दारात परसबाग, सांडपाणी व्यवस्थापन केले जाते. गावातील लोकांचे आरोग्य हे CSR मधील एका फिरत्या दवाखाण्यावरून लक्षात येते गावात फिरता दवाखाना तर येतो मात्र त्या तीन तासात रूग्णांची संख्या मात्र फारच कमी पाहायला मिळते. 

गावातील शाळा अन् अंगणवाडी म्हणजे सौंदर्याने भरलेला निसर्गातील एक चमत्कारच आहे. या शाळेत आयुर्वेदीक झाडे, पक्षांसाठी उद्यान, मुलांना खेळायला विविध साधने, गवताचं प्रशस्त क्रीडांगण,  प्रशस्त स्वच्छता सुविधा  या सर्व बाबींमुळे शाळेमध्ये मुलांना शिकण्यात आनंद मिळतोच पण घरासारखे वातावरणही निर्माण होतं. शाळेत स्वच्छता विषयक विविध धडे मुलांना दिले जातात. यातून कान्हेवाडी गावामध्ये उद्याची स्वच्छ पिढी तयार होत आहे. तत्कालीन आदर्श सरपंच नवनाथ पवार यांनी गेले पंधरा वर्षांत गावासाठी मेहनत घेऊन गावातील प्रत्येकाला चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा एक अधिकार मिळवून दिला आहे.     शासनाच्या विविध योजना आणने असेल व विविध कंपन्यांकडून CSR मिळविणे असेल किंवा गावातील लोकसहभाग घेणे असेल या सर्व बाबीतून गावाला एक स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सरपंच पवार यांना व गावातील सर्वच ग्रामस्थांना सलाम.

                        
गावाने निर्मलग्राम पुरस्कारांबरोबरच महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, गृहस्वामिनी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती पुरस्कार, लोकमत ग्राम गौरव पुरस्कार, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत. ग्रामपंचायतीला २००८ मध्येच ISO मानांकन प्राप्त झाले आहे. कान्हेवाडी तर्फे चाकण गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात 2017 मध्ये विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. कान्हेवाडी  गाव आता देशभर चर्चेचा विषय बनला आहे. स्वच्छता क्षेत्रातील गेले वीस वर्षांतील शाश्वत काम पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. भविष्यात इतर गावांना स्वच्छ भारत मिशन सारख्या योजनांसाठी एक आदर्श गाव म्हणून… एक स्वच्छ गाव म्हणून पाहण्यास निश्चितच आनंद होईल.

No comments:

Post a Comment